पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवलेल्या ग्रामीण भागातील जीवनावर आधारित
‘ऑस्करवाडी’ या मराठी वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्यातील ‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
अवकाळी पावसाचा तडाखा, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पिचला जात असताना, त्याने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून आपण त्याला सन्मानाने वागवायला हवे, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे. तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला जात असून, जवळपास ७० लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.
‘ऑस्करवाडी’चे आतापर्यंत ६४ भाग प्रसारित झाले असून, जगभरातले प्रेक्षक याच्याशी जोडले गेले आहेत. पुरंदर तालुक्यातच याचे चित्रीकरण केले जात आहे. या वेब सीरिजचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षय कटके आहेत. संवाद लेखन परेश मरकड यांचे तर, छायाचित्रण आणि संकलन मंगेश टाकले यांचे आहे. स्थानिक कलाकारांनाही यात संधी मिळाली असून, कुंडलिक घिसरे, प्रियांका पालकर, पूजा वाल्हेकर, सायली कामठे, शुभम कोरडे, कादंबरी होले आदी कलाकार यात काम करत आहेत.